
भिवंडी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राज्यभर गाजत असलेल्या पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला निर्णायक वळण मिळाले आहे.
बिजेंद्र गुप्ता गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. त्याच्या शोधासाठी विशेष तपास पथकाकडून बिहारसह विविध राज्यांमध्ये छापेमारी सुरू होती. अखेर त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी भिवंडीत आणण्यात येणार आहे.
या प्रकरणात यापूर्वीच विविध राज्यांमधून १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये गुप्ताच्या पत्नीचाही समावेश आहे. अटक आरोपींपैकी अनेकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून या रॅकेटचे धागेदोरे बिहार, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रापर्यंत पसरल्याचा संशय पोलिसांना आहे.
प्राथमिक तपासात आरोपी टोळीने टीईटी प्रश्नपत्रिकेचे चारही संच परीक्षा होण्यापूर्वी मिळवल्याचे समोर आले आहे. ही प्रश्नपत्रिका सुमारे दीड कोटी रुपयांना विकण्याचा डाव आखण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र, भिवंडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीमुळे हा डाव परीक्षा होण्यापूर्वीच उधळण्यात आला.
तपासादरम्यान प्रश्नपत्रिका छपाई केंद्रातील काही कर्मचाऱ्यांच्या सहभागाचीही माहिती समोर आली आहे. आरोपींकडून मोबाईल, हार्ड डिस्क, बनावट ओळखपत्रे आणि महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांकडून आरोपींचे बँक व्यवहार, कॉल रेकॉर्ड आणि संपूर्ण आर्थिक साखळीचा कसून तपास केला जात आहे.
बिजेंद्र गुप्ताच्या चौकशीत प्रश्नपत्रिका बाहेर काढणारे कर्मचारी, मध्यस्थ, संभाव्य खरेदीदार आणि या संपूर्ण रॅकेटमागील इतर सूत्रधारांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. विशेष तपास पथकाकडून आणखी काही ठिकाणी छापेमारी केली जाण्याची शक्यता असून या प्रकरणातील अटकसत्र वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, नीटसह विविध परीक्षांतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात देशभर संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून लावून धरण्यात आली आहे.
आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरू असून विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे व पीडित कुटुंबांना मदत देण्याच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर टीईटी पेपरफुटीतील मुख्य सूत्रधाराची अटक ही परीक्षा माफियांविरोधातील अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.









